बरेच दिवस एकंदरीत कविता, स्फुट लेख इत्यादींच्या उचलेगिरीवर लिहायचं म्हणत होतो. आज मराठी अनुदिनींवर चाललेल्या उचलेगिरीवर ट्युलिप आणि संगीता यांनी लिहिलेलं वाचून त्याला मुहूर्त लागला.
मलाही आधी असे एक-दोन अनुभव आलेत. 'मी सखाराम गटणे' सारखा पटकन लक्षात येणारा नवीन लेख असो किंवा 'दोन याचक' सारखी लगेच न कळणारी छोटीशी , अडीच वर्षांपूर्वी लिहिलेल्या माझ्या पोस्टवरून केलेली उचलेगिरी असो -- दोन्हींच्या मागे, डोळे मिटून दूध पिणार्या मांजराला आपली चोरी कोणी पाहत नाही असं वाटत असतं, तशीच मनोवृत्ती असते.
दुर्दैवाने हे फक्त अनुदिनींवरच होत नाही, तर क्वचित मनोगतासारख्या व्यासपीठावरही होतं. उदाहरणार्थ अजितचं हे पोस्ट पहा आणि मनोगतावरचा हा लेख वाचा. कळस म्हणजे, हे निदर्शनाला आणून दिले असतानाही, तोंडदेखली माफी मागणे किंवा खोटंच का होईना - लेखकाचे नाव प्रसिद्ध करायचे राहून गेले अशी सारवासारव करणेही त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. तीच कथा गटणेचीही.
ओर्कुटबद्दल तर बोलायलाच नको. कित्येकांचे लेख, कविता मंडळी आपल्या नावाने प्रसिद्ध करत असतातच. पण अजून एक ढळढळीत उदाहरण म्हणजे 'मराठी साहित्य' या नावाच्या कम्युनिटीचे वर्णन वाचा. त्यात आणि मी माझ्या अनुदिनीबद्दल वर लिहिलेल्या दोन-तीन वाक्यांत जर काही साधर्म्य आढळले, तर तो योगायोग समजावा :). खरं सांगायचं तर, कॉपी करावं असं त्या वाक्यांत काही विशेष आहे, असं मला वाटत नाही. त्यामुळे हे बरंच आधी लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग मी निवडला. पण ज्या विषयाची तुम्हांला (तथाकथित) आवड आहे, त्याबद्दलच्या दोन ओळीही तुम्हांला उचलेगिरी करून लिहाव्याशा का वाटतात?
या गोष्टीला ट्युलिपने वाचा फोडलीच आहे, तर असे प्रकार टाळण्यासाठी काय करता येईल त्याचाही विचार व्हायला हवा.
Saturday, March 08, 2008
Subscribe to:
Posts (Atom)
