Wednesday, March 29, 2006

नूतन वर्षाभिनंदन

आपणा सर्वांना नूतन वर्षाच्या (शालिवाहन शके १९२८) शुभेच्छा.

प्रसिद्ध अक्षरलेखनकार अच्युत पालव यांच्या संकेतस्थळावर सापडलेल्या या चित्रासोबत, त्यांनीच सजवलेली विंदांची ही (नववर्षातील वाटचालीला कदाचित अनुरूप) कविता येथे देत आहे. या संकेतस्थळाची माहिती दिल्याबद्दल विवेकचे विशेष आभार.

(Please click on the image to enlarge.)

Friday, March 24, 2006

(तथाकथित) सुमार साहित्य आणि विंदा

मराठी साहित्यात मोजके अपवाद वगळता कसदार वाङ्मय निर्माणच झालेले नाही आणि ज्ञानेश्वर-तुकाराम-केशवसुत-मर्ढेकर सोडले तर युगप्रवर्तक(!) कवींचीही वानवा आहे, अशी ओरड अनेकदा ऐकू येते. समीक्षकांनी आणि भालचंद्र नेमाडेंसारख्या लेखकांनीही अशी विधाने केलेली आहेत. (मराठी सिनेमाला ऑस्कर कधी मिळणार या धर्तीवर मराठीत शेक्सपिअर का निर्माण होत नाहीत, या विषयावर अनेक वसंत-हेमंत-शिशिर व्याख्यानमाला रंगतात.) शिवाय लोकप्रिय लेखन हे सवंग लेखन, ते खरे अभिजात साहित्य नव्हेच अशीही एक धारणा प्रचलित आहे. सुहास शिरवळकर, बाबूराव अर्नाळकर तर सोडाच पण पु.लं, व.पु., जी. ए. कुलकर्णी यांच्यावरही असा शिक्का उठवायला मराठी समीक्षकांनी मागेपुढे पाहिलेले नाही. इंग्रजी साहित्याशी याची तुलना केली तर असे आढळेल की, जेफ्री आर्चर, सिडने शेल्डन, फ्रेडरिक फोरसिथ, जॉन ग्रिशम आणि तत्सम लोकप्रिय लेखकांना सहसा असे विनाकारण कमी लेखले जात नाही; तर अशाही वाचनव्यवहाराची निकड समाजाला आहे याचे भान बाळगले जाते. (संदर्भ - माझ्या कॉलेजमधील इंग्रजीचे एक मानद प्राध्यापक)

दलित साहित्याचा अपवाद वगळता, बहुतांशी लेखन हे मध्यमवर्गाभवती केंद्रित राहिले आहे असाही एक आरोप केला जातो. बहुतेक लेखक आणि वाचकही याच वर्गातून येत असल्याने तसे होणे अपरिहार्य आहेच. जसजसा मराठी माणूस इतर उद्योगांत हातपाय पसरू लागेल, देशोदेशींना भेटी देऊ लागेल तसतसे त्याच्या जाणीवांचे व अनुभवांचे क्षितिज विस्तारेल आणि या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटेल. अर्थात, हळूहळू का होईना तसे व्हायला सुरुवात झालेली आहेच. 'इडली, ऑर्किड आणि मी' व 'इजिप्तायन' या दोन पुस्तकांचे यावर्षी झालेले प्रकाशन आणि त्यांना लाभलेला उत्तम प्रतिसाद यासंदर्भात प्रातिनिधिक म्हणता येईल.

असो, या तथाकथित सुमार साहित्याविषयी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी विंदांना काय वाटते हे विजया राजाध्यक्षांनी त्यांच्याशी साधलेल्या संवादातून येथे वाचता येईल. (बहुपेडी विंदा - खंड १)

या तटस्थतेचा (लेखननिवृत्तीचा) आणखी काही परिणाम?

- फार महत्त्वाचा एक परिणाम आहे. सांगतो. आता मी स्वतः त्या खेळात नाही. हिरीरी उरलेली नाही. त्यामुळे भोवती जे काही चाललं आहे ते तटस्थपणे बघतो. ज्यांच्या लेखनाला काडीमात्र अर्थ नाही असे वाटत होते, त्यातला अर्थही जाणवू लागतो.

तो कसा काय?

- काही लोकप्रिय लेखकांचं उदाहरण घेऊ. मी ते वाचलेले नाहीत, वाचू शकत नाही, हे सोडा. पण असं वाटतं की, नवशिक्षित समाजासाठी या लेखकांची आवश्यकता आहे. त्यांची सांस्कृतिक भूक हे लेखक भागवतात. त्यांची वाचनाची सवय वाढवतात. सामान्य वाचक बिचारे स्वतःच्या आनंदासाठी वाचतात; कसलाही आव नसतो. 'उच्चभ्रू'पणाची ऐट आणणारी माणसं त्यांच्याहून अधिक घातक असतात. सामान्य माणूसही आपल्या कुवतीनुसार निवड करत असतो. आपण त्यांना काहीच कळत नाही असं कसं म्हणायचं? आणि उच्चभ्रूंना तरी सगळं कळतं असं कुठं आहे? वाचकांचे अनेक थर आहेत, यांतला कोणताही एक थर वंचित ठेवणं हे पाप आहे. म्हणून त्या लोकप्रिय लेखकांनी लिहू नये असं म्हणण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही. आपल्याला ते आवडत नसेल तर आपण वाचू नये. ही गुळमुळीत तडजोड नव्हे; ही जीवनाच्या वस्तुस्थितीची थोडी उशिराच घेतलेली दखल आहे. मी जोपर्यंत लिहीत होतो तोपर्यंत ही दखल मी घेतलेली नव्हती. लोकांनी हे वाचू नये, ते लिहूही नये, असा आग्रह असे. पण आता अनेक प्रकारच्या व अनेक दर्जाच्या लेखनव्यापारांची अर्थपूर्णता पटू लागली आहे.

आजच्या मराठी वाङ्मयाबद्दल तुम्ही एकंदरीने समाधानी आहात!

- अशी कल्पना करा की, वाङ्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते, त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणेच जंगलंही पाहिजेत, वाळवंटं पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडं पाहिजेत. जंगलाची शोभा त्यातच आहे! मराठी वाङ्मयाचं दुर्दैव हे, की या जंगलात महावृक्ष नाहीत. याचा अर्थ मराठीत व्यास-शेक्सपिअर-टॉलस्टॉय-डोस्टोव्हस्की नाहीत. ती तक्रार नाही. ते युगा-युगांनंतर येतात. पण आपल्याकडे त्यांच्या आसपास पोचतील असे वृक्षही नाहीत. याचं दुःख वाटलं पाहिजे. त्याऐवजी आपण दुःख कशाचं करतो? तर अमुक लेखक सामान्य लिहितात आणि ते वाचलं जातं, याचं! आपल्या साहित्यव्यवहाराचा एक भाग - एकमेकांना मोठं करणं, आणि दुसरा भाग - सामान्य लेखक सामान्य आहेत, हे पुनःपुन्हा सांगणं. खासगीत त्यांची टिंगल करणं. प्रत्येकालाच 'हॅम्लेट' आवडेल असं कुठे आहे हो? शेक्सपिअरनं असामान्यांना दिलं तसं सामान्यांनाही भरपूर दिलं. तो अभिरुचीच्या अधोगतीबद्दल कुढत बसला नाही. काव्यक्रांत्या वगैरे भानगडीतही पडला नाही. त्या तोलामोलाची प्रतिभा असली की अनेक गोष्टी आपोआप साधतात. जुन्या मराठी काव्यातील ज्ञानेश्वर व तुकाराम हीच दोन नावं मराठीनं जगात मिरवावी अशी. पण आमच्या ज्ञानबा-तुकारामाच्या गजराला आता ते संतही कंटाळले असतील! त्या जागतिक तोलामोलाचं आम्ही काय केलं?

यावर काही उपाययोजना?

- कवीनं मोकळ्या मनानं, कोणतेही पूर्वग्रह न बाळगता, समीक्षकांची किंवा इतर कसलीही दडपणं येऊ न देता - म्हणजेच आपल्या मस्तीत लिहीत राहावं अन् वाचकानं ते वाचत राहावं. मोठे कलावंत कोणत्याही बाह्य कारणामुळे निर्माण होत नाहीत. आपण मात्र साहित्याचा इतिहास शिकवताना ती कारणमीमांसा करतो. संगती लावून दाखवणं हे माणसाचं व्यसन असतं. रिनेसान्सची मूव्हमेंट, त्यातून मिळालेल्या प्रेरणा, इंग्लंडमधली वाङ्मयाची परंपरा, वगैरे. पण हे सगळं स्ट्रॅटफर्डमधल्या एका अर्धशिक्षित माणसापर्यंत कसं येऊन थडकलं हो? आणि तिथेच का भडकलं हो? त्याच्या ठिकाणीच हा उद्रेक का झाला? 'त्याच्या प्रतिभेमुळे' एवढंच त्याचं खरं उत्तर! किंवा त्याहूनही - त्याला उत्तर नाही, हेच खरं उत्तर!

(अंतर्नाद मासिक, मार्च २००६ अंक)

Tuesday, March 14, 2006

होलिकोत्सवाच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा

आपणा सर्वांना होलिकोत्सवाच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा. दै. लोकसत्तेत आलेला श्रीकांत बोजेवारांचा हा खुसखुशीत लेख नक्की वाचा.

Sunday, March 12, 2006

मालतीबाई बेडेकर

गेल्या आठवड्यात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला. मराठी साहित्यातील कथालेखिकांबद्दल बोलायचे झाले तर मेघना पेठे, सानिया, गौरी देशपांडे, आशा बगे, ऊर्मिला पवार, प्रिया तेंडुलकर, कुसुमावती देशपांडे, स्नेहलता दसनूरकर, सुमती क्षेत्रमाडे अशी अनेक नावे घेता येतील. तर आत्मचरित्रात्मक लेखन करणार्‍यांत लक्ष्मीबाई टिळक (स्मृति-चित्रें), सुनीता देशपांडे (आहे मनोहर तरी), कमल पाध्ये (बंध-अनुबंध), माधवी देसाई (नाच गं घुमा), सुमा करंदीकर (रास) यांचे लेखन लक्षणीय आहे. या सर्व नामावळीत एक नाव अग्रहक्काने घ्यावे लागेल, ते म्हणजे मालतीबाई बेडेकरांचे.

'विभावरी शिरूरकर' या टोपणनावाने लेखन करणाऱ्या या लेखिकेने वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी लिहिलेल्या 'कळ्यांचे निःश्वास' या कथासंग्रहाने मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवली. 'खरे मास्तर' आणि 'हिंदोळ्यावर' ही त्यांची इतर काही गाजलेली पुस्तके; आणि 'रणांगण' सारख्या मराठी साहित्यात मैलाचा दगड मानल्या गेलेल्या कादंबरीच्या निर्मितीचे मुख्य कारणही त्याच. २००५-०६ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. 'बाबांचा संसार माझा कसा होणार?' या त्यांच्या कथेतील काही भाग खाली देत आहे.

तिशी उलटलेल्या कमावत्या मुलीच्या पगारावर घर चालत असल्याने तिला लग्नाचा विचार पुढे ढकलण्यास सांगणारे तिचे वडील आणि त्या अनुषंगाने कथानायिकेने केलेला स्वार्थ, प्रेम आणि त्याग यांच्या परस्परसंबंधांचा विचार असे या कथेचे साधारण स्वरूप आहे. प्रेमाला मम-ता (माझेपणा) का म्हणतात याचा उलगडा या भागातून होऊ शकेल. कदाचित त्यांचे काही विचार पटणार नाहीत, पण त्यामागची विचारी वृत्ती आणि स्पष्टता सहज दिसून येते. तसेच १९३३ सालच्या तुलनेने कर्मठ समाजासमोर मांडताना त्यांनी जे धैर्य दाखवले, ते केवळ अतुलनीय म्हणावे लागेल.

...

बाबांचे विचार ऐकून मी थक्क झाले. त्यांना तरी माझे बरे होऊ नये असे खात्रीने वाटत नसेल. पण गरिबीच्या चरकाने त्यांच्या संसाराची अशी काही चमत्कारिक आणि नाजूक स्थिती झाली आहे, की त्या निराशेच्या व भीतीच्या दडपणामुळेच केवळ त्यांच्या तोंडून त्या दिवशी असे बदसूर निघाले. मी खूप रडले. माझी विचारसरणी वडिलांना कशी कळत नाही? ती मी बोलू कशी? बाबा तरी एकदा तरूणच होते ना?

हे त्यांना कळत नाही म्हणूनच मला कधीकधी वाटते, की आईबापांचे प्रेमही व्यापारी प्रेम असते. मुलांकडून मोबदला न मिळाला तर प्रेमाचे नाणेही खणखणीत वाजत नाही. मग त्याला हवे तर व्यवहार म्हणा. पण त्या मोबदल्याकरिता मनुष्याचे मन थोडे तरी विकृत होईलच होईल. माझ्या भवितव्याचा विचार करू लागले की बाबा मला स्वार्थी म्हणतात; पण त्यांच्या संसाराकरिता का होईना, माझ्या भावना दूर झुगारून देणारे बाबासुद्धा त्याच दोषाचे मालक होत नाहीत का?

कित्येक वेळा मला एका गोष्टीबद्दल गूढ वाटते आणि ते म्हणजे स्वार्थ कशला म्हणायचे नि निःस्वार्थ कशाला म्हणायचे? मला तरी वाटते, की स्वार्थ हा शब्द बहुरूपी आहे. एका बाजूने तो पूर्ण स्वार्थ वाटेल तर हळूहळू रंग पालटीत तोच स्वार्थ निःस्वार्थासारखा दिसू लागेल. निःस्वार्थ म्हणून ज्याला आपण म्हणतो, तोसुद्धा एका अर्थी स्वार्थच नाही का?

...

एखादा मोठा वंद्य पुरूष स्वार्थत्याग करतो याचा अर्थ स्वार्थत्याग करण्यात सुख असते, स्वार्थत्याग त्याने केला नाही तर त्याल दुःख वाटते.

...

याही पलीकडे जाऊन शास्त्रज्ञ भावनाशून्य अंतःकरणाने कसा विचार करतात हे पाहण्यासारखे आहे. प्लेटोने का कुणीसे म्हटले आहे, की 'आईसुद्धा मुलाला का पाजते, तर दुग्धधारा दाटून आल्याने तिच्या अंगच्या कळा कमी व्हाव्या म्हणून!' मी ज्या वेळी हे वाक्य वाचले तेव्हा ते मला अगदीच पटले नाही. वाटले, बोलून चालून निर्घृण हृदयाचा शास्त्रज्ञ! त्याने असे नाहीतर कसे उद्गार काढायचे? आईबद्दल असे उद्गार! मग जगातील इतरांना आपमतलबी म्हणायला ह्या शास्त्रज्ञांना काय कठीण जाणार आहे?

पण अनुभवाने जर या विचारसरणीकडे पाह्यचे म्हटले तर हे बरेचसे खरे असावे असे वाटू लागते. स्वत्वाची भावनाच मुळी स्वार्थ खेचून आणणारी आहे. 'माझं कुटुंब', 'माझी आई', 'माझे बाबा', 'माझा भाऊ', 'माझी बहीण' असे जेव्हा जेव्हा मी म्हणते, तेव्हा तेव्हा कुटुंबावर अथवा प्रत्येक व्यक्तीवर माझे जे प्रेम असते, ते स्वार्थावरचे अवगुंठण असते. स्वार्थच प्रेमाचा बुरखा घेऊन वावरत असतो. त्याच्यात काही चांगले-वाईट, किंवा काही तर-तम अशी प्रतवारी असणे, याचा परोक्ष वा अपरोक्ष संबंध 'माझ्या'शी असतो. माझ्यातला 'मी'वर त्याचा परिणाम होत असतो. तो सुखदायक परिणाम व्हावा म्हणूनच, म्हणजे स्वार्थानेच मी या सर्वांचे चांगले चिंतीत असते. त्या 'मी'वर यांचे चांगले होण्याचा परिणाम तितकासा सुखदायक होत नाहीसा झाला व माझेच केवळ चांगले होण्याने सुख होऊ लागले, की मी 'स्वार्थी' झाले. कारण इतरांच्या सुखाची मी उपेक्षा केली; ते थोडे फार कमी केले.

...

एकूण सर्वांचा सगळाच स्वार्थ नि सगळाच निःस्वार्थ. प्रश्न केवळ व्याप्तीचा! त्यामुळेच तो चांगला-वाईट ठरत असतो.