Saturday, October 24, 2009

कोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना

भालचंद्र नेमाड्यांची १९६३मध्ये प्रकाशित झालेली 'कोसला' ही मराठीतली अतिशय गाजलेली कादंबरी. नेमाड्यांनी त्यांच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी, कथानायक ‘आज उदाहरणार्थ पंचविशीचा’ आहे असे सांगून लिहिलेली ही कादंबरी पंचेचाळीस वर्षे झाली तरी आपला प्रभाव टिकवून आहे. मूलपण आणि प्रौढ पुरुष यांच्यामधली गोंधळलेली अवस्था, जगाच्या भंपकपणाचा येणारा राग, स्वत:च्या डोक्यातला विचारांचा 'कल्लोळ कल्लोळ', पुढे नक्की काय करायचे आहे याचा काहीच निर्णय होत नसल्याने येणारी अस्वस्थता, आणि अशातच शरीराच्या गरजांचे वाढत्या उत्कटतेने जाणवू लागणारे अस्तित्व या सार्‍यांचा कोलाज कोसलाने मराठीत प्रथमच मांडला. ज्ञानेश्वरीतही वापरल्या गेलेल्या कोसला ह्या खानदेशी शब्दाचे मूळ म्हणजे ‘कोश’. वेगळेपणा, अलम दुनियेपासून तुटलेपण ह्या रुढ अर्थाबरोबरच एकमेकांत गुंतलेल्या वेगवेगळ्या धाग्यांनी तयार झालेले क्लिष्ट, काहीसे संरक्षक असे जाळे असाही ह्या रुपकाचा अर्थ नेमाड्यांना अभिप्रेत असावा.

फडके-खांडेकरांच्या प्रभावांपासून नुकतेच मोकळे होऊ लागलेल्या, स्वातंत्र्योत्तर काळातला भ्रमनिरास स्वीकार करण्याच्या मनःस्थितीत येऊ लागलेल्या मराठी वाचकवर्गाने अशा या वेगळ्या वाटेवरच्या पुस्तकाला डोक्यावर घेतले नसते, तरच नवल. आजही आकाशवाणीने वाचकांकडून मागवलेली मराठीतील सर्वोत्कृष्ट पुस्तकांची यादी असो, वा अंतर्नादची सर्वोत्तम २० पुस्तकांची यादी - कोसलाचा त्यात समावेश असतोच. साठोत्तर साहित्यातील मराठीतील सर्वात महत्त्वाची म्हणता येईल अशी ही कादंबरी, इंग्रजीतल्या जे. डी. सॅलिंजर यांच्या 'कॅचर इन द राय' या कादंबरीवर बेतलेली आहे/ तिच्यापासून प्रेरणा घेऊन लिहिलेली आहे, असा प्रवाद जेव्हा प्रथम ऐकला; तेव्हा काहीसे आश्चर्यच वाटले.

त्याची शहानिशा करावी या हेतूने या दोन्ही कादंबर्‍या एकापाठोपाठ एक वाचल्या. या दोन कादंबर्‍यांतील साम्यस्थळे, आणि फरकही जाणवले. ते लिहिण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, हा सारा उपद्व्याप ‘कोसला’सारखी लोकप्रिय कादंबरी कशी परप्रकाशित किंवा कमअस्सल आहे, हे सांगण्याच्या अभिनिवेशातून केलेला नाही. कोसलाने अनेकांना झपाटून टाकले आहे. तिची वेगळी शैली, ओळखीचे वाटणारे अनुभव आणि त्या वयातली अचूक टिपलेली मानसिकता - यामुळे ती केवळ तीस-चाळीस वर्षांपूर्वी पंचविशीत असणार्‍या पिढीला जवळची न वाटता, आजच्या पिढीलाही ओळखीची वाटते. त्यामुळे मूर्तिभंजकाचा आव आणून, जे जे लोकप्रिय ते ते टाकाऊ, अशा सवंग अट्टाहासातून हे लेखन केलेले नाही.

दुसरे म्हणजे, तसे पाहिले तर साहित्यात फार थोड्या गोष्टी, फार थोड्या थीम्ज ह्या ओरिजिनल, मूळच्या आहेत.‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं’ या न्यायाने कुठलाही विषय आत्तापर्यंत अस्पर्श राहिला असेल, असे वाटत नाही. तेव्हा या मूळ कल्पनांमध्ये लेखकाने स्वत:ची शैली कितपत जाणवून दिली आहे, स्वतःच्या प्रतिभेची कितपत गुंतवणूक केली आहे हे अधिक महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे, कोसला आणि कॅचरचा नायक हा कॉलेज सोडलेला, सारख्याच पराभूत मानसिकतेत सापडलेला आहे; या साम्यापेक्षा त्यांच्या शैलीतील साम्य (आणि अर्थातच फरकही) मला अधिक महत्त्वाचा वाटतो. अर्थात, ‘कादंबरी उत्कृष्ट आहे ना? झालं तर! मग तिची प्रेरणा कुठूनही का असेना’, या विधानाला काही प्रतिवाद नाही; कारण कादंबरीच्या आस्वादात तिच्या प्रेरणास्रोताच्या स्थानामुळे काही बाधा येत नाही हे नक्की.

या दोन कादंबर्‍यांतील साम्यस्थळे दाखवायची झाली तर, दोहोंतला सुरुवातीचा परिच्छेदच पुरेसा बोलका आहे. ‘बट आय डोन्ट फील लाईक गोईंग इंटू इट…आय ऍम नॉट गोइंग टू टेल यू माय होल गॉडडॅम ऑटोबायोग्राफी’, या मंगलाचरणाने सुरुवात करणारा होल्डन आणि ‘खरं तर तुम्हांला वगैरे सांगण्यासारखं एवढंच...पण मी अगदी सगळंच सांगणार नाही’ म्हणणारा पांडुरंग सांगवीकर.‘काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही’ हे दोघांचेही ध्रुवपद.

दोघांचेही वडील कर्तबगार; पांडुरंगाच्या शब्दांत सांगायचे तर ‘रंगारूपाने प्रतिष्ठित’. एकाचे वडील सधन शेतकरी, तर दुसर्‍याचे चांगली कमाई असणारे वकील. त्यामुळेच की काय, पण पैशाच्या बाबत दोघेही अगदी उधळे नसले तरी काहीसे बेफिकीर. गॅदरिंगच्या बजेटबाहेर गेलेल्या खर्चाचे प्रकरण ‘कोसला’मध्ये येते; तर टाईपरायटर स्वस्तात विकून पैसे घेण्याची, अगदी लहान बहिणीने ख्रिसमससाठी साठवलेल्या पैशांतून उधार घेण्याची पाळी कॅचरमध्ये होल्डनवर येते. मेसच्या हिशोबात पांडुरंग फसवला जातो, तर होल्डनला वेश्या आणि तिचा दलाल ठकवतात. असे झाल्यावर ‘आपण कोणतंच काही नीट केलं नाही’ ही (पांडुरंगच्या शब्दांतील) भावना आणि असे फसवले गेल्यानंतर आत्महत्या करावीशी वाटणे - हेही दोन्हीकडे सारखेच. पांडुरंग मेस, गॅदरिंग इ. मध्ये निष्काळजीपणे अडकतो; तर होल्डन कॉलेजच्या फेन्सिंग टीमचा मॅनेजर बनतो खरा - पण त्यांचे सामान ट्रेनमध्ये विसरून परत येतो. ह्या स्वभावदोषावर (किंवा वैशिष्ट्यावर) ‘कोसला’त थोडीफार टिप्पणी येते, पण होल्डन मात्र ‘सम गाईज स्पेन्ड डेज लूकिंग फॉर समथिंग दे लॉस्ट. आय नेव्हर सीम टू हॅव एनीथिंग; दॅट इफ आय लॉस्ट, आय वुड केअर टू मच’ असे परिणामकारक भाष्य करून जातो.

दोन्ही नायकांच्या आयुष्यांत त्यांच्या धाकट्या भावंडांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. ऍलीचा आणि मनीचा, लहान वयात झालेला मृत्यू दोघांना उद्ध्वस्त करून जातो. मृत्यूच्या या अन्यायाने संतापून जाऊन होल्डन रात्रभर गॅरेजमध्येच झोपतो. आपल्या हाताने तिथल्या खिडक्या फोडतो, गाडीच्या काचाही फोडण्याचा प्रयत्न करतो. पांडुरंग ‘मी याचा सूड उगवीन’ अशा प्रतिज्ञा करून लहान मुलींची पिवळी साडी चिंध्या करून पेटवून देतो. त्या जाळात हात भाजल्यावर, शाईने तळवे थंड करून खोलीभर त्याचे शिक्के उमटवतो. इतर जगाला समजून घेताना त्रास होत असला, तरी मनीशी आणि फीबीशी त्यांचा संवाद जुळतो.

दांभिकतेबद्दलचा दोघांचाही उपहास एकाच जातकुळीतला. होल्डनला त्यांच्या शाळेतल्या चर्चमध्ये येऊन भाषण देणार्‍या उद्योगपतीबद्दल वाटणारा आणि पांडुरंगाला वक्तृत्वमंडळात जाणवलेला. इतिहासाबद्दल दोघांच्या प्रतिक्रिया सारख्याच. ‘साल्यांना शिलालेख सापडले वगैरे, म्हणून अशोकाची माहिती कळली. मधले कुठले पुरावे नसले, की हे लोक वाटेल तसे ठोकताळे बांधतात’ म्हणत पांडुरंग इतिहास सोडून मराठी घेतो. अशाच धर्तीवर इजिप्शियन्सबद्दल लिहून ‘मला एवढंच माहीत आहे, मला नापास केलंत तरी चालेल’ अशी शरणचिठ्ठी उत्तरपत्रिकेतच लिहून होल्डन शाळा सोडतो.

दोन्ही कादंबर्‍यांतील तपशीलांत याहूनही काही अधिक साम्ये आहेत. निरर्थकपणाचे तत्त्वज्ञान म्हणून की काय, पण कल्पित (मेक-बिलिव्ह) भंकस करणे (होल्डनचे टोपी घालून आंधळ्याप्रमाणे वावरणे, गोळी लागल्याचा अभिनय करणे तर पांडुरंगाचे सुर्शाबरोबर नऊ हजाराव्या शतकातले इतिहासकार असल्याचे समजून विसाव्या शतकाबद्दल बोलणे किंवा इचलकरंजीकर बरोबर मधुमिलिंद हे आडनाव घेऊन टाईमपास करणे इ.); वर्गातल्या मुलींचे पुढे कुणाशी लग्न होईल याबद्दलचे ‘करूण’ (ज्यांना होल्डन डिप्रेसिंग) म्हणतो असे विचार मनात येणे; क्लासिक पुस्तकांबद्दल चर्चा करणे (पांडुरंगचे मेहताशी डी.एच. लॉरेन्सबद्दल, होल्डनचे डीबीशी मॉमच्या ऑफ ह्यूमन बॉन्डेजबद्दल) वगैरे.

पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे दोन्ही निवेदनांतून जाणवत राहणारे शैलीतील साम्य. वर म्हटल्याप्रमाणे, तपशीलांतील साम्यापेक्षाही शैलीतील साम्य मला अधिक महत्त्वाचे वाटते. ‘कोसला’च्या लोकप्रियतेमागे कथानकापेक्षा शैलीचा वाटा काकणभर अधिकच असावा. दोघांचीही निवेदनाची शैली पराभवाचा स्वीकार केलेली, थोडी तुटक अशी आहे, आणि हे अधोरेखित करायला म्हणून की काय; सॅलिंजर कथनात ‘ऑर एनिथिंग, सॉर्ट ऑफ, अँड एव्हरीथिंग, दॅट किल्ड मी.’ अशा शब्दसमूहांची वरचेवर पेरणी करतो. ह्याचेच प्रतिबिंब नेमाड्यांच्या गाजलेल्या ‘वगैरे, उदाहरणार्थ आणि थोर’ मध्ये पडलेले आहे, हे कोसलाच्या वाचकांना सहज कळून येईल.

‘कॅचर इन द राय’ जिथे संपते, तिथे कोसलाचा उरलेला अर्धा प्रवास सुरू होतो; असे म्हणायला हरकत नसावी. कॅचरची मध्यवर्ती कल्पना जरी तीच असली, तरी तिचा पट कोसलाच्या तुलनेत लहान आहे. होल्डन मनोरुग्णालयातून (अथवा सॅनिटोरियममधून) गेल्या ख्रिसमसच्या काही दिवसांबद्दल सांगतो आहे, एवढाच. कोसलामध्ये याउलट पंचविशीतला सांगवीकर त्याच्या आयुष्यातील काही वर्षांविषयी सांगतो आहे. ह्या मोठ्या पटाचे फायदे आहेत, तसेच अर्थात तोटेही.

मोठा पट असल्यामुळे कोसलात काही ठिकाणी थोडा पसरटपणा येणे अपरिहार्य आहे, पण त्याचबरोबर पांडुरंगची मनःस्थिती दर्शवणारी रोजनिशी नेमाड्यांना वेगवेगळे भाषिक प्रयोग करायलाही वाव देते. ‘पूर्वजांच्याच नशिबी नपुंसकगिरी नव्हती. म्हणून हे फेरे - मर्द बापांपायी’ सारखी वाक्यं याच भागातली. मनीच्या मृत्यूचे प्रकरण नेमाड्यांनी अतिशय जीवघेणे लिहिले आहे. ‘तिच्याबरोबर तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिने एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली’, यासारख्या ओळी पहिल्याच प्रयत्नात ‘कट निअरर द एकिंग नर्व्ह’चा परिणाम साधून जातात.

पण या गोष्टींबरोबरच दुसर्‍या भागात, पांडुरंगाचा संपूर्ण पराभवाकडे होणारा प्रवास दाखवताना कोसला काही ठिकाणी विस्कळीतही होते. कॅचर मात्र एखाद्या परिणामकारक शॉर्ट फिल्मसारखा नेमका परिणाम साधून उत्कर्षबिंदूवर थांबते. नायकाच्या संपूर्ण पराभवाचा, त्याच्या हतबल मानसिकतेचा संपूर्ण प्रवास दाखवण्याच्या भानगडीत ती पडत नाही. हा एक मुख्य फरक वगळला तर; अंतर्नादच्या श्रेष्ठ पुस्तके विशेषांकात संजय जोशींनी लिहिलेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे कोसला निर्णायकपणे पराभूतवादी तर कॅचर ढोबळमानाने आशावादी, होल्डनच्या भवितव्याबद्दलच्या सार्‍या शक्यता मोकळ्या ठेवून संपली असल्याचे म्हटले आहे, ते तितकेसे पटत नाही. होल्डन सॅनिटोरियममध्ये असल्याचे कादंबरीच्या सुरुवातीला आणि शेवटी पुरेसे स्पष्ट केले आहेच. उलटपक्षी अखेरीस पांडुरंग 'उदाहरणार्थ काही झालं तरी हे आपल्याला खुंट्यावर आणून वगैरे बांधतीलच. मग नेमकं अगोदरच खुंट्यावर येऊन उभं राह्यलेलं बरं' ह्या तडजोडवादी वृत्तीचा स्वीकार करताना दाखवला आहे.

अगदी गेलेल्या वर्षांबद्दल बोलताना 'आपापली वर्षं पुढे अचूक शिल्लक असतातच...तेव्हा गमावली ही भाषा उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही' अशीही टिप्पणी करतो. कादंबरीच्या विस्तारानंतर प्रवाहाच्या विरूद्ध पोहायची धडपड सोडून देऊन तथाकथित व्यवहारी शहाणपण अंगीकारलेला पांडुरंग सांगवीकर हा या दोन कादंबर्‍यांतला मुख्य फरक. सारांश म्हणजे, पुनरुक्तीचा आरोप पत्करून, ऑगस्ट स्ट्रिंडबर्गच्या भाषेत सांगायचे झाले तर एकाच दु:खाची नस शोधणार्‍या दोन वेगळ्या मातींतल्या ह्या दोन असामान्य कादंबर्‍या. कोसला लिहिताना नेमाड्यांनी 'कॅचर'वरून प्रेरणा घेतली आहे, हे अमान्य करता येणार नाही. तपशीलांतील आणि त्याहूनही महत्त्वाचा म्हणजे, शैलीतील सारखेपणा वरवरच्या वाचनातही जाणवण्यासारखा आहे. पण त्याचवेळी कोसला ही कॅचरची नक्कल आहे असे म्हणणे चुकीचे, अन्याय्य ठरेल. मूळ कल्पनेत नेमाड्यांनी स्वत:च्या प्रतिभेची गुंतवणूक करून तिचा थोडा विस्तार केला आहे, हे नक्की. समीक्षकी भाषेत, त्यामुळे कॅचर अधिक 'टोकदार' ठरते आणि कोसला थोडी 'पसरट' होते असे म्हणायचे की, कोसला हे कॅचरच्या वाटेवरचे पुढचे पाऊल आहे असे ठरवायचे; हा भाग अलाहिदा (आणि व्यक्तिसापेक्षही).

[अन्यत्र पूर्वप्रकाशित]

Sunday, October 26, 2008

जे जे उत्तम...४ [कोसला]

ती अतिशय शांत होती. कामात, बोलण्याचालण्यात, गाणं म्हणण्यात, शाळेत जाण्यात.

आई म्हणायची, हिला मेंदूच नाही. कंदिलाची काच मोरीत दुसरं कुणीही घासत असतांना फुटली की आई म्हणायची, मन्ये, थांब कारटे. मग मनी घरातून म्हणायची, मी नाही ग आई. मी झाडते आहे. कुणी दुधाचं भांडं आडवं केलं की आई घरातून म्हणायची, मनीच असणार.

दर वेळी मुलगीच होते, म्हणून आजी नेमकी मनीच्या वेळी बाळंतपणाला कंटाळली. घरातले सगळे व्याप सांभाळून पुन्हा आईचं करायचं. ती तान्ह्या मनीचं अंग घसघसून घासायची. एकदा कडक पाण्यात थंड पाणी मिसळायचं विसरूनच तिला पायांवर पालथं घेऊन पाण्याचा चटका लागल्यावर आजी म्हणाली, आता कोण हिला परत पाळण्यात टाकेल, गार पाणी मिसळून पुन्हा घरातून हिला आणून पायावर घेईल? मग मनी किंकाळून रडली, तेव्हा आई घरातून आली. आणि पाण्यात हात घातल्यावर रडून म्हणाली, उठा मी धुते. तेव्हा आजी मनीला जमिनीवर आपटून म्हणाली, मुलींच्या आईनं एवढी मिजास करू नये.

पण आईचंसुद्धा मनीवर फार प्रेम नव्हतं. ती पोटांत असताना आईला पण वाटायचं, इजा बिजा तिजा. हा तिसरा मुलगाच होईल. पण झाली मनी. म्हणून वडलांचीसुद्धा हिच्यावर तिरपी नजर होती.

...

मनीच्या अंगावरचे फोड लिंबाएवढे झाले. आजी हिसपिस करत तिची व्यवस्था पाह्यची. आई छोट्या नलीकरता मनीच्या फार जवळ जायची नाही. दुरून पाह्यची. मनी आईला पाहून, मला घे म्हणून दोन्ही हात वर करायची. पण आई घ्यायची नाही.

फोड टरारले तेव्हा मात्र आई मनीच्या खाटेजवळ फक्त बसायला लागली. घराच्या कुणालाच तिथे येऊ देत नव्हते. फोड खाजवू नये म्हणून मनीच्या दोन्ही हातांत लहानलहान लांब पिशव्या अडकवून त्या मनगटांवर गच्च बांधून टाकल्या होत्या. पिशव्यांतून देखील ती फोड खाजवून फोडायची. म्हणून तिचे दोन्ही खांदे रक्तबंबाळ झाले होते. मग आजीने संतापून तिचे हात खाटेच्या दोन्ही बाजूंना करकचून बांधून ठेवले.

मग ती हात सोडा म्हणाली.
तेव्हा आईनं एकदा विचारलं, मनूताई, तुला काय हवं? पाणी?
तेव्हा मनी बोललीच नाही.
आई म्हणाली, मने बोल, बोल. उद्या तुला बोलता येणार नाही. आज माझ्याशी बोल.
पण ती आईशी बोललीच नाही.
आजी म्हणाली, मनूताई, दादाला तिकडून काय आणायला सांगू?
तेव्हा ती म्हणाली, लाल साडी.
लाल साडी.
हे ती म्हणाली, तेव्हा नेमकं त्या वेळी मी इकडे काय करत असेन? खोलीत होतो की टेकडीवर? की मित्रांबरोबर हसत होतो,की खिडकीतून टेकडीकडे पहात होतो?
तिला मी आठवलो असेन. लाल साडी.
हे ती मला दर सुट्टीत सांगायची. आणि मी दर वेळी म्हणायचो, पुढच्या वेळी नक्की.
मग मी साडी आणणार म्हणून ती माझी किती तरी कामं करायची. माझी पाठ खाजवून दिली नाही की मी म्हणायचो, लाल साडी हवी ना?
हळूहळू तिचा आवाज बंद होत आला. घशात पण फोडफोड असतील. डोळ्यांत तर फोड पडून बाहुल्या पांढर्‍या झाल्याच होत्या.
आई म्हणाली, मनूताई तुला काय हवंऽय?
मनी म्हणाली, माझे हात सोडा. आग, आग, आई, आग गं.
मग तिचं तोंडच उघडेना. तोंडात ओतलेलं आत जाईना. डोळे तर गेलेच होते.
आई खाटेच्या तिकडच्या बाजूनं हाक मारायची, मनूऽ
आणि ती दोन्ही हात ख्रिस्तासारखे बांधलेले ठेवून पांढरे डोळे ताणताणून नेमकी तिकडे पाह्यची.
मग आई उशामागून हाक मारायची, मनूताईऽ.
तेव्हा ती डोकं वर करून पाह्यची.
डोळे होते कवड्यांच्यासारखे शुभ्र.
आजी म्हणाली, अजून ऐकू येतंय.
आणि दोन दिवसांनी तिला न न्हाणता-धुता गावाबाहेर पुरून आले. आणि तिच्याबरोबर तिच्या खाटेला लागलेलं सगळं पुरून आले. तिची शाळेत जायची छोटी पिशवी, तिची चादर - सगळं.


मग दोन-तीन दिवस मी संतापून गेलो. पण कशावर संतापावं हे कळेना. कशावर?
मी म्हणालो, मी वडलांचा खून करीन. मी आजीला ठार मारीन. मग मी सगळं घर पेटवून देईन. सगळ्यांची प्रेतं त्या घरात जाळून टाकीन, आईला जिवंत. हे असं मरणं.
मनीला पुरलं पुरलं पुरलं. मी भावनांनी खरोखरच भडकून गेलो. बंडल नाही.
मी एक पिवळीजर्द लहान मुलींची साडी विकत आणली. आणि तिचे बोटबोट तुकडे केले. ते पेटवून दिले. त्या जाळात माझे हात भाजले. मग दौत जमिनीवर ओतून माझ्या हातांचे चटके थंड केले. शाईनं तळवे भिजवून भिजवून सगळीकडे माझ्या हातांचे शिक्के मारले. उशीवर, गादीवर, टेबलावर, वह्यांवर, पुस्तकांवर, दारावर, खिडक्यांवर, भिंतीवर.
मग पातेल्यातलं सगळं दूध खाली एका कुत्र्याच्या बेवारशी पिल्लाला पाजलं.
मी म्हणालो, मी याचा सूड उगवीन. दर महिन्याला शंभर रुपये खर्चीन. महिन्याला दोनशे रुपये मागवीन.
मी एकटा वेताळ टेकडीवर निघून आलो. केव्हा वेड्यासारखा धावत सुटलो. केव्हा नुसता बसून राहिलो. रात्री पुण्यातले अनेक रस्ते पायी हिंडलो. एका पोलिसानं हटकलं तेव्हा मी म्हणालो, माझी बहीण मेली.

...

आणि मी म्हणत होतो, धर्माचं होतं-नव्हतं तेवढं गाठोडं बांधून ती निघून गेली. निघण्यापूर्वीच्या वेदना आमच्या स्मरणासाठी ठेवून देऊन. तिनं एवढंच तोडलं नाही - जे तिच्याआमच्यात कायम राहील. बाकीचं सगळं - सगळ्या जमिनीवरच्या रेघा पुसून टाकल्या. ती नुकतीच नेमानं शाळेत जात होती. घरून सात वाजायच्या आतच तिला ढकलून द्यायचे. ती नुकतीच बाराखडी शिकली होती. आणि तिला फक्त शिकवलेलेच धडे वाचता यायचे. तेव्हा भिंतीवर तेवढीच अक्षरं तिला दिसली असतील. खिशात सागरगोट्या होत्या. फ्रॉकचं कापड अंगाला चिकटलं होतं. हे सगळंच टाकलं. ती सर्वत्यक्त काळोख्या लांब रात्रीची वाट चालत असेल आता. जेव्हा मीही त्या वाटेवर जाईन, तेव्हा ती किती तरी पुढे गेलेली असेल. म्हणजे सापडणारच नाही. गेलं ते गेलं, आता नवं काही - असं म्हणून. तिच्याबरोबरच तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली. आणि तिला हेही काहीच नाही. तिला कसलाच पार नाही. तीर नाही. किनारा आहे, जो फक्त एकदाच गाठता येईल. तिनं धर्म तरी काय बरोबर नेला असेल? तिनं येतांना फक्त कर्म आणलं. जातांना फक्त काळोखा प्रवास. तिचा प्रवास तिचाच. ती सर्वमुक्त. हेमुक्त तेमुक्त. रंगमुक्त. अंगमुक्त. मनमुक्त. संज्ञामुक्त. ती मुक्तिमुक्त. तिचं पुसट मनोबिंब फक्त माझ्याजवळ.

...

कादंबरी - कोसला
लेखक - भालचंद्र नेमाडे

Friday, September 26, 2008

बरेच काही उगवून आलेले...[अंतिम भाग]

[प्रस्तावना - या लेखाचा पहिला भाग येथे वाचता येईल. हा (थोडा रुक्ष) भाग, झाडांचा चेतनागुणोक्ती अलंकारात झालेल्या साहित्यातील उपयोगाविषयी आहे, आणि उदाहरणार्थ द.भा. धामणस्कर, रेगे, बोरकर यांच्या काही कविता उद्धृत केल्या आहेत.]

माणसाचं किंवा मानवी जीवनाचं रुपक म्हणून झाडांचा साहित्यात उपयोग कायमच होत आला आहे. पण याचं 'मूळ' काय? उत्क्रांतीच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर झाडालाही आपल्यासारखा जीव आहे, कदाचित भावनाही आहेत हे आपल्याला समजलं असावं? आदिमानवाला जेव्हा आपल्यासारख्याच वाढणार्‍या, खुरटणार्‍या, बहरणार्‍या आणि उन्मळून पडणार्‍या झाडाबद्दल प्रथम आत्मीयता वाटली, ही झाडं तर आपल्यासारखीच असं वाटून जिवाचे मैत्र जडले; तो क्षण 'मा निषाद'च्याच तोडीचा असावा. आणि कदाचित सुसंस्कृत होण्याचा पहिला टप्पाही.

ज्या गोष्टीबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटतो, तिला आपल्या गोटात ओढण्याचा आपण जाणता-अजाणता प्रयत्न करत असतोच, त्यातलाच झाडांचे रूपक, हा एक भाग असावा असं मला वाटतं. (ममता हा शब्दच मुळात मम-ता म्हणजे माझेपणा यातून आला असावा. आत्मीयता, आपलेपणा यांचे शब्दशः अर्थही तसेच.) एखाद्या जिवलग मित्राला भावासारखा म्हणून अधिक आतल्या वर्तुळात आपण ओढत असतो, त्यातला प्रकार. तेव्हा झाडांवर होणारं हे मानवी भावभावनांचं 'रोपण' वृक्षवल्ली आम्हां सोयरी याच भावनेतून उगवलं असावं.

'जो खांडावया घाव घाली, की लावणी जयाने केली, दोघां एकची साऊली, वृक्षु जैसा' म्हणत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणारे आणि काव्य म्हणजे काय, विचारल्यावर जिच्याकडे बोट दाखवावं अशा 'कोंभाची लवलव, सांगे मातीचे मार्दव' सारख्या ओळी लिहून गेलेले ज्ञानेश्वर; वृक्षवल्लींना सोयरी म्हणणारे तुकाराम आणि कांदा, मुळा, भाजीत विठाई पाहणारा सावतामाळी; पाण्यात पाय सोडून बसलेला बालकवींचा औंदुबर; नितळ न्याहारीला काळा वायू घेणारी मर्ढेकरांची झाडं; गीतरामायण लिहिताना झालेल्या उन्मनी अवस्थेचे वर्णन 'चंद्रभारल्या जिवाला नाही कशाचीच चाड; मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड' अशा शब्दांत करणारे गदिमा; 'प्रत्येक झाडामाडा त्याची त्याची रुपकळा, प्रत्येक पानाफुला त्याचा त्याचा तोंडवळा' म्हणत प्रत्येक माणसातलं वेगळेपण शोधणारे, पावसाळ्यात 'वेली ऋतुमती झाल्या गं' असं लिहून जाणारे बोरकर; तमाच्या तळाशी दिवे लागल्याचा अपूर्व अनुभव 'रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले; तिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनि फाकले' अशा शब्दांत मांडणारे शंकर रामाणी; निष्पर्ण तरुंच्या राईत 'झाडांत पुन्हा उगवाया'ची आस लागलेले ग्रेस; 'आणिक तुझिया लाख स्मृतींचे, खेळवीत पदरात काजवे; उभे राहुनी असे अधांतरी, तुजला ध्यावे, तुजला ध्यावे' अशी रक्तामध्ये ओढ मातीची लागलेल्या इंदिराबाई संत; युगानुयुगीच्या चिर-तंद्रीत कृष्णाची प्रतीक्षा करणार्‍या राधेला 'जलवाहिनी निश्चल कृष्ण, वन झुकले काठी राधा, विप्रश्न' म्हणणारे पु. शि. रेगे; 'ग्रासली झाडे दिशांनी नग्नदेही, कोरड्या डोळ्यांत आता थेंब नाही' असं लिहून जाणारे महानोर; 'रांडेपेक्षा आहे रांड, मुलापेक्षां आहे मूल' असे रोखठोक वर्णन करणार्‍या विंदांचे 'उगाचफूल'; काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग लिहिणारे दासू वैद्य; 'नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तिथे' म्हणणारा संदीप खरे; गद्यातले उदाहरण द्यायचे झाले तर अंतू बर्व्याच्या दारातला गेली चाळीस वर्षं न मोहरलेला हापूस, 'कोसला'मध्ये वेताळाच्या टेकडीवरचं झाड पाहून - 'खरं झाड म्हणजे जमिनीत असतं. वरचं झाड म्हणजे आतडी, फुफ्फुसं असं. माणसाचं जमिनीत काय आहे?' असे आणि तत्सम प्रश्न पडणारा पांडुरंग सांगवीकर किवा बर्ट्रांड रसेलला 'गर्भश्रीमंतीचे झाड' म्हणणार्‍या पद्मजा फाटक; चौकट राजातलं बोन्सायच्या झाडाचं उघड रुपक आणि जवळचा भाग असूनही गूढ, अज्ञात राहिलेल्या देवराईचं तरल प्रतीक; शाकुंतलातील 'आद्ये वः कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः' अशा शकुंतलेच्या वर्णनापासून ते रुदालीत गुलजारच्या 'तेरा छूंआ लागे, मेरी सूखी डाल हरियाए' पर्यंत अक्षरशः एक प्रबंध लिहिता येईल इतकी उदाहरणं सापडतील.

...

जन्माला, नवनिर्मितीला पालवीची उपमा अगदी प्राचीन आहे. आणि ह्या वाढणार्‍या अंकुराला पाहून, 'सोसंल का त्याला, ऊन वारा पानी' म्हणत धास्तावणारे जन्मदात्यांचे वात्सल्यही तितकेच सनातन. द. भि. धामणस्कर त्यांच्या 'बरेच काही उगवून आलेले' मधल्या 'केळीचे पान' या कवितेत म्हणतात तसे -

...तर हिरव्या पाना
अस्तित्वाच्या लांबलचक देठाभोवती मातीनं
सुरक्षित गुंडाळून ठेवलेलं तुझं
शैशव उलगडत जाताना मी
किती हळुवार, किती हळवा झालो होतो हे
तुला नीट सांगताही येणार नाही आता मला...
सुरुवातीच्या पहाटत्या हिरव्यात
अधिकाधिक हिरवेपण कसे भरत गेले याचा
क्षणाक्षणांचा हिशेब माझ्या डोळ्यांत...
आता ऐन नव्हाळीत एक सौंदर्यसंपन्न हिरवा
तुझ्यात काठोकाठ भरून आणि मी
बराचसा कृतार्थ तुझा
आत्यंतिक उत्कटतेचा दिवसही
पाहतो आहे म्हणून्; तसा खूपसा भयभीतही -
तथाकथित जगरहाटीनुसार तुझ्या विनाशाला आता
कधीही सुरुवात होईल म्हणून...

मला दिसते आहे, प्राणपणाने
जपावे असे काही तुझ्यात - तू
एक देखण्या पूर्णत्वाचं प्रतीक तुझ्या अखंडतेत;
या प्रदेशातून वाहणारे चंचल वारे मात्र
माझ्याशी सहमत नाहीत. भय वाटते ते
त्यांचेच...


स्त्री ही क्षणाची पत्नी, पण अनंतकाळची माता असते असं म्हणतात. तसंच पत्नीत 'गृहिणी सखी सचिवः' च्या जोडीला आईपण शोधणार्‍या पुरुषालाही पितृसुलभ वात्सल्याची भावनाही जाणवत असतेच. अशाच समजूतदार, प्रेमळ सख्याच्या रुपातली पु. शि. रेग्यांची 'शेवगा' ही छोटेखानी कविता.

दोन प्रहर. निवांत सारें.
श्रमभराने बाजेवरतीं
पांगुळलेली तू.
खिडकीबाहेर ढाळितो चवरी
आसुरलेला शेवगा दारचा.


'सा विद्या या विमुक्तये' सारखाच प्रगल्भ प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे हा आपल्या वात्सल्याचे बंधन न होऊ देण्याचा. अडनिड्या वयात उगाच रागावून अबोल होऊन बसणारी टीन-एजमधली मुलं काय किंवा वेगळ्या वाटा शोधायला घर सोडून निघालेलं तारुण्य काय; सोशिक अनाग्रही आईबाप धामणस्करांच्या 'परिपक्व' झाडांसारखेच -

रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही...

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत...


कशासाठी जगावं, हा प्रश्न कळतं झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर पडत असावा. पण वृद्धत्वात आणि 'मिड-लाईफ'मध्ये कदाचित जरा जास्तच वेळा. बोरकरांची ही कविता, अनंत काणेकरांच्या त्या प्रसिद्ध लघुनिबंधातलं तत्त्वज्ञानच सांगते ('दोन मेणबत्त्या'मधील दुसर्‍यासाठी जगलास तर जगलास, स्वत:साठी जगलास तर मेलास); पण जरा बदलून. 'स्वतःला विसरून दुसर्‍यांसाठी जगा' पेक्षा 'स्वतःबरोबरच दुसर्‍यांनाही आनंद देत जगा' असे. गीतेतल्या वर मुळे, खाली फांद्या असलेल्या अश्वत्थ वृक्षाचे रूपक रंजक आहेच, पण आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता जितके जमतील तितके वेगवेगळे अनुभव घ्या, असं शेवटच्या ओळीत सांगणारे बोरकर या एका ओळीतूनच 'बाणा कवीचा' दाखवून जातात. आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात त्यातले इतर अन्वयार्थही स्पष्ट होत जातातच.

कुणासाठी तरी या रे, या रे मोडून फळांनी
कुणासाठी तरी झुका, झुका जडून फुलांनी

कुणासाठी तरी, या रे गाढ भरून सुखांनी
कुणासाठी तरी, गा रे मुक्त सहस्र मुखांनी

पसरून पाळेमुळे, धरा धरित्रीचा तळ
पानोपानी खेळवा रे, तिच्या कुसव्याचे जळ

भुजाबाहूंनी कवळा, स्वैर धावणारे वारे
लक्ष हिरव्या डोळ्यांत, रात्री बिंबवा रे तारे

व्हा रे असे अलौकिक, लोकी येथल्या अश्वत्थ
कंप भोगा शाखापर्णी, मुळी राहून तटस्थ


उत्पत्ती, स्थितीबरोबरच लयाचा निर्देश करण्यासाठीही झाडांचं रूपक वापरलं जातं. छान पिकत जाणार्‍या वृद्धत्वाची तुलना अनाग्रही, समजूतदार झाडांशी होणे साहजिकच. वाढत्या वयात, कळत जाते तसे राग-रोष सरून एक अलिप्त एकटेपणा येतो. पाडगावकर म्हणतात तसा 'सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालण्याचा' समजूतदारपणा. 'जो तो आपापला येथे कुणी ना आधार' चा शहाणा स्वीकार. अशा वेळी, बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर -

कळत जाते तसे, कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून, कसे तळ्यामधेच पेंगू लागतात

अशी अवस्था होते. बोलण्यात वारंवार पिकल्या पानांचे, वठलेल्या खोडाचे संदर्भ येतात. असं असलं तरी, मागे वळून पाहताना मनाच्या एका समाधानी अवस्थेत, आपलं आयुष्य अगदीच काही वाया गेलं नाही अशी कृतकृत्यतेची जाणीवही कधी दिलासा देऊन जाते. 'जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले' सारखी. द. भा. धामणस्करांची ही शेवटची कविता अशीच नम्र कृतार्थतेची भावना अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करते -

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...


[समाप्त]

Sunday, September 21, 2008

बरेच काही उगवून आलेले...[भाग १]

झाडांबद्दल मराठीत शेकडो लेख, कविता आल्या असाव्यात. बोरकरांच्या किंवा अलीकडे द. भा. धामणस्करांच्या कविता वाचताना, घासून गुळगुळीत झालेल्या ह्या रूपकालाही नवीन रूपडं कसं बहाल करता येतं, हे जाणवतं. सगळं आयुष्य शहरात गेल्यामुळे असेल, पण 'वृक्षवल्ली आम्हां सोयरे' वगैरे आतून मला कधीच वाटलं नव्हतं. पण गेल्या काही महिन्यांत झाडांची वेगवेगळी रूपं पाहिली. इतकी भिन्न, इतकी वेधक की अगदी अट्टल शहरी माणसालाही त्यांच्यात रस निर्माण व्हावा. त्यांच्याबद्दल लिहून, त्यांना न्याय द्यायचा तर तेवढीच अलौकिक प्रतिभा हवी. तिचा अभाव असला, तरी पूर्वसुरींनी जे काम करून ठेवलंय ते अधूनमधून आठवत होतं. ही कदाचित - लाईफ इमिटेटिंग आर्ट, आर्ट इमिटेटिंग लाईफ सारखी आस्वादाची दुहेरी प्रक्रिया असावी. म्हणजे क्वचित कधी सरत्या संध्याकाळी जसं 'कहीं दूर जब दिन ढल जाये' आठवतं किंवा पावसात 'ओ सजना'/'रिमझिम गिरे सावन' डोक्यात प्ले होऊ लागतं; त्याच्या उलट सारे प्रवासी घडीचे किंवा शंकर पाटलांच्या कथा वाचताना आपला गाव आठवतो किंवा लंपन वाचताना आपणही लहानपणी असाच बर्‍याचदा मॅडसारखा विचार करायचो असं वाटत राहतं. रोजच्या जगण्यात अचानक एखाद्या कलाकृतीची आठवण व्हावी आणि कधी काही वाचताना, ऐकताना 'स्मरणाचा उत्सव जागून' विसरलेलं काही पुन्हा आठवावं - ही जोडी तशी रंजक आहे.

अर्थातच, हे नेहमी होणे नाही. तसं झालं तर त्यातली उत्स्फूर्तता, मजा निघून जाईल. त्यामुळे झाडं पाहून आठवलेल्या त्या एक-दोन कविताच फक्त लिहिण्यापेक्षा एकंदरीतच सापडलेले झाडांचे उल्लेख एका लेखात लिहावेत असं जेव्हा प्रथम डोक्यात आलं; तेव्हा हे कृत्रिम तर होणार नाही ना, ही शंकाही जोडीनेच आली. पण त्या एखाद-दोन क्षणांचा कल्पनाविस्तार केला तर इतरांनाही कदाचित त्यात काही ओळखीचं सापडेल, असंही वाटलं. त्यामुळेच हे - 'बरेच काही उगवून आलेले...'

...

दहिसरचं मुंबईकरण होण्यापूर्वी अनेक वेगवेगळी झाडं पहायला मिळायची. शाळेला जायच्या रस्त्यावर पांगारा आणि अमलताश होते. ग्रीष्मात अनुक्रमे लाल आणि पिवळ्या रंगांत फुलून यायचे. ठिकठिकाणचे गुलमोहर, देवळाकडचं पार असलेलं पिंपळाचं झाड, गुंजाची - बदामाची झाडं, सुबाभूळ, अशोक आणि कितीतरी नाव माहीत नसलेली फुलझाडं - दहिसरचं दहा वस्त्यांचं गाव हे वर्णन सार्थ ठरवत.

शाळेच्या इमारतीतून मैदानापलीकडचं खाचर दिसायचं. गडद पावसाळी दिवसांत अंधारून येऊन पाऊस पडायला लागला की तिथली झाडं अक्षरशः झोडपून निघायची. क्वचित बाईही मग शिकवणं थांबवायच्या. अंधारल्या वर्गात बसून ढगांच्या गडगडाटात, डोळेभरुन ती गदगदणारी झाडं मग सगळे पाहत राहत. पण शाळा म्हटली की, प्राथमिक शाळेच्या जवळचं एक झाड आठवतं. त्याच्या अंगाखांद्यावर 'रम्य बाल्य ते जिथे खेळले' पासून त्या तरूतळी 'तसव्वुर-ए-जानाँ किये हुए' करत बसून राहण्यापर्यंतची सर्वांची प्रगती, तशी त्याच्याच जोडीने झाली. मित्राने एक अतिशय जुना फोटो पाठवल्यावर या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. यंदाच्या फेरीत हे झाड दिसलं नाही, पण त्याच्या नसण्याने काही विशेष वाटलंही नाही. जुनी इमारतच मोडकळीला आल्याने वर्गही नवीन जागेत भरू लागले होते. तेव्हापासून त्याचं प्रयोजनच संपलं असावं.

ग्रँटरोडच्या चिखलवाडीच्या चाळीत मात्र झाडांचं इतकं कौतुक करायला कुणाला सवड नसे. नाही म्हणायला नानाचौकाकडून चौपाटीकडे जाताना मणीभवनच्या गल्लीत हिरवीगच्च झाडे दिसत. त्या रस्त्याचे नावही रसिकतेने लॅबर्नम रोड, म्हणजे बहावा/अमलताश मार्ग ठेवलेलं. मागे जसं फोर्टमधल्या टॅमरिंड लेनचं 'मुदण्णा शेट्टी मार्ग'(!) म्हणून नामकरण झालं; तसंच लॅबर्नम हे कुण्या इंग्रजाचं नाव असल्याने (बापूंच्या वास्तव्याने पुनीत इ. झालेल्या) मणीभवनकडच्या त्या रस्त्याचं नावही बदलण्याचा घाट मुंबई महापालिकेने घातला होता. सुदैवाने तो बेत तेव्हा तडीस गेला नाही.

झाडांबद्दल लिहित असताना कोकणातल्या झाडांचा उल्लेख होणार नाही, हे अशक्यच. लेकुरवाळा फणस. काजूची बुटकबैंगण झाडं, करवंदीच्या जाळ्या, रातांबे नि जामाची झाडं. हापूस-पायरी-रायवळ-माणकुराद आंब्यांची कैक झाडं. आंबा पिकून जाळीत पडल्याचा आवाज आल्यावर, भावंडांबरोबर शर्यत लावायची आणि ज्याला प्रथम सापडेल त्याने तो खायचा. 'आठवणींच्या चिंचा गाभुळ' ऐकलं की चिंचांऐवजी, त्या आंब्यांचीच चव आठवते. फुलझाडांची तर गणतीच नाही. पण तळकोकणात काय किंवा गोव्यात काय; ज्याला व्यवच्छेदक म्हणावं असं झाड म्हणजे नारळाचं. हिरवं मोकळं खाचर आणि त्याच्या कडेला असलेली माडाची झाडं काय सुरेख दिसतात. पाच-सहा झाडांतलं एक उगाच तिरपं, जमिनीशी अधिक सलगी साधत वाढलेलं असतं. एखाद्या फॅमिली फोटोसाठी प्रौढ मंडळी गंभीरपणे उभी आहेत, आणि मध्येच एखादा गोटू गंमतीने जरा वाकड्याच पोझमध्ये उभा राहला आहे, असं ते पाहून वाटत राहतं. मंगेशी-शांतादुर्गेच्या देवळाबाहेरच्या तळ्यांवर हिरवी सावली धरणारे माड मात्र तसे गंभीर. अर्थात, हे झाड खरे पहावे ते किनार्‍याजवळ. माडांशिवाय कुठल्याही किनार्‍याला शोभा नाही, हे पुलंचं मत इकडचे भुंडे किनारे पाहिले की पटतं. रेड्डीच्या महागणपतीकडे जाणारा रस्ता सुंदर आहेच, पण तितकाच देवळापाठचा किनाराही. लाल माती, हिरवी झाडी आणि समोरची निळाई.

Reddy

...

इथल्या प्रवासांत वेगवेगळी झाडं पहायला मिळाली. आधी अनोळखी, अपरिचित वाटणारी. हळूहळू सवयीने मग थोडीफार ओळखीची झालेली. शिकागोला दोन वर्षांपूर्वी भर थँक्सगिव्हिंगच्या (नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा) गेलो होतो. तपमान शून्याच्या बरंच खाली. नुकताच बर्फ पडून गेलेला. भणाणत्या वार्‍यामुळे आणि अपुरे गरम कपडे आणल्याने गोठलेला मी. अशा वेळी चालताना एक वळण घेतलं, आणि अनपेक्षितपणे दिव्यांनी मढवलेली निष्पर्ण तरुंची राई समोर आली.

Sears tower Snow-fall 050

पुढे कधीतरी जेव्हा पु. शि. रेग्यांची 'गंधरेखा' वाचली, तेव्हा - एक आहे झाड माझे, रांठ ज्याच्या जीर्ण शाखा; साठीषण्मासी परंतु लाख ज्या येती शलाका - या ओळीवर अडखळून हीच झाडं पुन्हा डोळ्यासमोर उभी राहिली.

एक आहे झाड माझें रांठ ज्याच्या जीर्ण शाखा;
साठिषण्मासीं परंतु लाख येती ज्या शलाका

झाड माझें लाल ज्याला आग्रहाची लाख पानें;
आणि माझी बंडखोरी घोषतों मी गात गाणें.

झाड माझें लाखमोली लाल ज्याला फक्त पानें,
नेणतां ये एक ज्याला शुभ्र कांही जीवघेणें.

एक, ज्याला जाणिवेच्या लांच्छनाच्या गंधरेखा;
पाहतों मी ज्यात माझें झाड, माझ्या आणभाका


ग्रेसच्या बर्‍याच कवितांसारखाच या कवितेचा अर्थ बिनचूकपणे सांगणे अशक्य आहे. पण हट्टाने बंड करुन, जगाशी सारे संबंध तोडून आपल्या कोशात राहिलेल्या - वेळोवेळी ती आग्रही लाल पानांची तुसडेपणाकडे झुकणारी बंडखोरी मिरवणार्‍या; एखाद्या वठलेल्या खोडासारख्या माणसाला काही कारणाने, अवचितपणे 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले' सारखी पालवी फुटावी (नेणतां ये एक ज्याला शुभ्र काही जीवघेणें) आणि ती हवीहवीशी वाटली तरी इतक्या वर्षांच्या सवयीने त्या गंधरेखेबद्दल थोडी शरम वाटावी, असं काहीसं. थोडक्यात 'ऍज गुड ऍज इट गेट्स' मधली जॅक निकल्सनची तुसड्या, विक्षिप्त लेखकाची ऑस्करविजेती भूमिका. झाडांवर झालेल्या मानव्याच्या आरोपाबद्दल (चेतनागुणोक्ती अलंकार) पुढे लिहीनच, पण 'पाहतों मी ज्यात माझें', असं हे रेग्यांचं झाड त्याचं उत्तम उदाहरण ठरावं.

...

शिकागोतल्या या झाडांसारखी इतर अनेक झाडं भटकंतीत सापडत गेली. स्मोकी माऊंटन नॅशनल पार्कमधलं वार्‍या-पावसात करकरणारं 'कराल' झाड. सॅन फ्रान्सिस्कोजवळचं प्रसिद्ध 'द लोन सायप्रस' आणि त्याच्या शेजारी दुर्लक्षलेलं 'देहा फुटले वारा फांटे, अंगावरचे पिकले कांटे, आभाळांत खुपसून बोटें' उभं असणारं 'घोस्ट ट्री'. ब्राईस कॅन्यनमध्ये 'खडकावरील अंकुरा'सारखं उगवून आलेलं एकुलतं एक झाड. रेडवूडमधली गाढ हिरवी शांतता, सिकोयामधले प्रचंड घेराचे प्राचीन वृक्ष. 'शिशिरऋतुच्या पुनरागमे, एकेक पान गळावयां' होण्यापूर्वी बॉस्टनजवळ झाडांवर पाहिलेला रंगांचा उत्सव. स्वप्नात केलेला प्रवास वाटावा, अशा कोलोरॅडोतल्या एका रेल्वेप्रवासात दोन्हीकडे पिवळ्या-लाल रंगांच्या पानांच्या झाडांनी भरून गेलेले डोंगर. पेट्रिफाईड नॅशनल फोरेस्टमधली 'माझ्या मना बन दगड' म्हणून चक्क दगड बनलेली झाडं. प्रत्येकाची तर्‍हा वेगळी.

पण या सर्वांत विलक्षण असेल तर ते आर्चेस नॅशनल पार्कमध्ये पाहिलेलं एक झाड. यूटाहमधल्या या अप्रतिम राष्ट्रीय उद्यानात 'फिएरी फर्नेस' म्हणून एक रेंजर-गायडेड, अर्थात उद्यान अधिकार्‍याच्या नेतृत्वाखालीच होणारा ट्रेक आहे. त्या ट्रेकदरम्यान रेंजरने एक झाड दाखवलं होतं. काही वर्षांपूर्वी त्याच्या खोडाच्या मध्यावर वीज पडून त्याच्या जळून जवळपास चिरफळ्या उडाल्या होत्या. पण जगण्याची इच्छा इतकी चिवट असते, की मृतप्राय झालेल्या त्या खोडालाही पुन्हा पालवी फुटली.

Day 6 Arches 1 054

एकाच या जन्मी, फिरुनि नवे जन्मलेल्या; पोटात वीज थिजवून उभ्या असलेल्या, जागेपण गिळून उभे असेपर्यंत वाढणार्‍या ह्या गूढ, जायबंदी झाडाला बोरकरांची ही कविताच न्याय देऊ शकते.

झाड गूढ झाड गूढ, ओल्या प्रकाशाची चूड
गार गार पारा गाळी, स्वप्नरंगांचे गारुड

झाड पाताळ फोडिते, झाड आकाश वेढिते
ताळमूळ संसाराचे गाठीगाठीत जोडिते

झाड वाकडे-तिकडे, छेडी फांद्यांची लाकडे
वीज थिजवून पोटी, वारी मेघांचे साकडे

झाड स्वच्छंदी आनंदी, सुखे होय जायबंदी
घावाघावातून गाळी, फुले ज्वा़ळांची जास्वंदी

झाड माझे वेडेपिसे, उन्हीं जळताना हसे
रुसे धो धो पावसात, चांदण्यात मुसमुसे

वेडे झोपेत चालते, अर्ध्या स्वप्नांत बोलते
गिळोनिया जागेपण, उभे आहे तो वाढते


...

(अखेरचा भाग या गुरूवारी)

Saturday, March 08, 2008

उचलेगिरी / हे श्रेय न माझे तुझेच देणे आहे...

बरेच दिवस एकंदरीत कविता, स्फुट लेख इत्यादींच्या उचलेगिरीवर लिहायचं म्हणत होतो. आज मराठी अनुदिनींवर चाललेल्या उचलेगिरीवर ट्युलिप आणि संगीता यांनी लिहिलेलं वाचून त्याला मुहूर्त लागला.

मलाही आधी असे एक-दोन अनुभव आलेत. 'मी सखाराम गटणे' सारखा पटकन लक्षात येणारा नवीन लेख असो किंवा 'दोन याचक' सारखी लगेच न कळणारी छोटीशी , अडीच वर्षांपूर्वी लिहिलेल्या माझ्या पोस्टवरून केलेली उचलेगिरी असो -- दोन्हींच्या मागे, डोळे मिटून दूध पिणार्‍या मांजराला आपली चोरी कोणी पाहत नाही असं वाटत असतं, तशीच मनोवृत्ती असते.

दुर्दैवाने हे फक्त अनुदिनींवरच होत नाही, तर क्वचित मनोगतासारख्या व्यासपीठावरही होतं. उदाहरणार्थ अजितचं हे पोस्ट पहा आणि मनोगतावरचा हा लेख वाचा. कळस म्हणजे, हे निदर्शनाला आणून दिले असतानाही, तोंडदेखली माफी मागणे किंवा खोटंच का होईना - लेखकाचे नाव प्रसिद्ध करायचे राहून गेले अशी सारवासारव करणेही त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. तीच कथा गटणेचीही.

ओर्कुटबद्दल तर बोलायलाच नको. कित्येकांचे लेख, कविता मंडळी आपल्या नावाने प्रसिद्ध करत असतातच. पण अजून एक ढळढळीत उदाहरण म्हणजे 'मराठी साहित्य' या नावाच्या कम्युनिटीचे वर्णन वाचा. त्यात आणि मी माझ्या अनुदिनीबद्दल वर लिहिलेल्या दोन-तीन वाक्यांत जर काही साधर्म्य आढळले, तर तो योगायोग समजावा :). खरं सांगायचं तर, कॉपी करावं असं त्या वाक्यांत काही विशेष आहे, असं मला वाटत नाही. त्यामुळे हे बरंच आधी लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग मी निवडला. पण ज्या विषयाची तुम्हांला (तथाकथित) आवड आहे, त्याबद्दलच्या दोन ओळीही तुम्हांला उचलेगिरी करून लिहाव्याशा का वाटतात?

या गोष्टीला ट्युलिपने वाचा फोडलीच आहे, तर असे प्रकार टाळण्यासाठी काय करता येईल त्याचाही विचार व्हायला हवा.

Monday, February 11, 2008

संत

काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी नाशकात बाबा आमटेंचा सत्कार घडवून आणला होता. तेव्हा भाषणाऐवजी त्यांनी "संत" ही कविता सादर केली होती.

“साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा”

आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा
उसासले आहेत माझ्या निरर्थक नभावर
सहस्त्रावधी वारकरी नेत्र
तुला पाहण्यासाठी.
माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत
निळ्या पाखरांचे थवे
तुझ्या वाटेवरची धूळ आपल्या पंखांवर वाहण्यासाठी.

आकाशाचं मन कळत नाही
वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय
प्रकाशाच्या देवळात शिरता येत नाही
दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय
म्हणून थोडं वारेपण - थोडं दिवेपण -
उचललं आहे माझ्या जिराईत अक्षरांनी
तुझ्याच मेघशील जीवनातून,
तुझ्याच स्वागताच्या कमानीवर तोरण बांधण्यासाठी.

लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी
झेप घेते आकाशात हरवलेपणानं
काळाच्या परमाणूत का होईना
पण बारीकसा सूर्य होण्यासाठी,
क्षणभर दिमाखानं जळण्यासाठी,
नंतर अनंत काल संकोचाशिवाय विझण्यासाठी.
तसंच आहे माझ्या शब्दांचं ह्या क्षणाला माखलेलं हे मोठेपण.

तसं पाहिलं, तर कोण तू आणि कोण मी?
कोसांच्या नव्हे तर जगांच्या अंतराने विभागलेले दोन अनोळखी प्रवासी.
आणि तरीही
माझ्या सभोवारच्या चिरेबंद काळोखाला
जातात केव्हा तरी तडे
आणि त्यातून पाहतो मी स्तंभित होऊन
स्वप्नात वितळलेल्या माणसाप्रमाणे
तुझ्या प्रकाशमय विश्वातील काही अग्निरेषा.

अशाच शंभर आभासांत पहाट, रात्रीच्या नि:शब्दातून
मी पाहिले आहे तुझे शिल्पचित्र तीनशे मैलांवरूनही.
सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात,
पृथ्वीच्या गर्भात पाय खोचणार्‍या विराट वृक्षावर
अपराजित कुर्‍हाड मारणारा तू.
सर्जन डॉक्टरांच्या सभागृहात डोंगराच्या सुळक्यासारखा उभा राहून
माझ्या देहात महारोगाची लस घाला
म्हणून आव्हान फेकणारा तू.
श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा
सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा
वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा
दु:खाच्या समोर फक्त निर्भेळ माणूस होणारा
दुबळ्या दयेच्या चिखलातून
माणुसकीला बाहेर काढणारा तू.
पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोचवणारा तू.

अरे, आम्ही आहोत असे करंटे
की आमच्या पेठेत लागतात पताका
फक्त मंत्री आले तर.

सोनेरी अंबारीचे ऐरावत जेव्हा झुलू लागतात रस्त्यावर
तेव्हा आमचे लाचार हिशेबी हात जुळून येतात छातीवर.
आमच्या गळ्यातले कोमल गांधार जातात
निषादाच्या तीव्र पट्टीवर
त्याचा जयजयकार करण्याकरता.

आणि तुझ्यासारखे संत
ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार
निघून जातात गस्त घालीत अंधारात.
उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून
आसवांच्या दलदलीतून
दु:खानं उसवलेल्या दुनियेवर
अमृताचं सिंचन करीत.

आणि

दोन शतकं गेल्यानंतर शोधू लागतो आम्ही वाळवंटावर
तुमच्या पायखुणा,
आम्ही होतो मशालजी आणि टाळकरी
तुमच्या मखमली पालख्यांचे
तुमच्या मेलेल्या मतांचे.
आम्ही होतो मतवाले शूर शिपाई
संरक्षण करण्यासाठी
मातीत मिसळलेल्या तुमच्या प्रेतांचे.

हे महामानवा,

आम्ही देणार आहोत तुला फक्त फावल्या वेळातला नमस्कार
एखादा गुच्छ एखादा हार
तीस पायांवर सरपटणार्‍या कॅलेंडरातील
एखादा शनिवार, रिकामा रविवार.

पण तरीही,

त्यातल्याच एका साक्षात्कारी क्षणाला आम्हाला कळतं,
आज सारा संसार उभा आहे क्रांतीच्या दाराशी
जुने पडते आहे, नवे घडते आहे
काळाच्या स्मशानातून उठलेली भुतावळ
जमिनीवरती जटा आपटीत रडते आहे रक्तबंबाळ होऊन.

मातीतून उठत आहेत गर्जना करीत लक्षावधी प्रचंड आकार
पोलादाच्या कारखान्यातील जळत्या राक्षसी तुळयांसारखे
तांबडेलाल,
काही तोडण्यासाठी काही जोडण्यासाठी.

या ऐतिहासिक हलकल्लोळात सनातन आणि अजिंक्य आहे
ते फक्त तुझ्यासारख्याचं हात उभारून
काळाच्या किनार्‍यावरुन धावणारं
संग्रामशील माणूसपण.

"तुम्ही जाता तुमच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा."

हे यात्रिका,

विस्कटलेल्या शरीरांचा, चुरगळलेल्या आत्म्यांचा जथा घेऊन
तू तुझ्या मार्गानं जा
मागे वळून पाहू नकोस.
जो हिशेब कधी केला नव्हतास,
तो यापुढेही कधी करू नकोस.
तुला साथसोबत आम्ही करणार नाही.
आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश
तुझ्या रात्रीवर पडणार नाही.
तुझ्या अलौकिक वेदनेसाठी आम्ही रडणार नाही.
आमच्या जयघोषांच्या जमावातही तू राहणार आहेस एकटा
दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा.

पण असेच एकाकीपण लाभले होते ख्रिस्ताला
ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर
असेच एकाकीपण लाभले होते बुद्धाला
ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसताहेत तुझ्या पथावर

हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण...

"जेथे जाशी तेथे - तो तुझा सांगाती
चालवील हाती - धरोनिया"

[कविता येथून साभार. धन्यवाद, मिलिंद :)]

Tuesday, February 05, 2008

तिचे अभंग, तिची गाथा

सकाळी उठावे | सुसाट सुटावे |
ऑफिस गाठावे | कैसेतरी ||

इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या |
वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या ||

चढावे बशीत | गर्दीत घुशीत |
रोज या मुशीत | कुटताना ||

धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम |
गाठण्या मुक्काम | सोस बये! ||

उशीर अटल | चुकता लोकल |
जीवही विकल | संभ्रमित ||

लागते टोचणी | भिजते पापणी |
जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||

मस्टर धोक्यात | छकुला डोक्यात |
आयुष्य ठेक्यात | बसेचिना ||

रोजची टुकार | कामे ती भिकार |
बंड तू पुकार | बुद्धी म्हणे ||

एक तो 'वीकांत' | एरव्ही आकांत |
समय निवांत | मिळेचिना ||

तेव्हाही आराम | असतो हराम |
कामे ती तमाम | उरकावी ||

लावून झापड | शिवावे कापड |
तळावे पापड | निगुतीने ||

कामसू सचिव | सखीही रेखीव |
गृहिणी आजीव | प्रियशिष्या ||

काया रे शिणते | मनही कण्हते |
कुणी का गणते | श्रम माझे? ||

नित्याची कहाणी | मनात विराणी |
जनांत गार्‍हाणीं | सांगो नये ||

पेचात पडतो | प्रश्नांत बुडतो |
जीव हा कुढतो | वारंवार ||

"अशी का विरक्त? | व्हावे मी उन्मुक्त |
जीव ज्या आसक्त | ते शोधावे ||

प्रपंच सगळा | सोडूनि वेगळा |
एखादा आगळा | ध्यास घेई ||

तारा मी छेडाव्या | निराशा खुडाव्या |
काळज्या उडाव्या | दिगंतरी ||"

अंगाला टेकत | लेकरु भेकत |
आणते खेचत | भुईवर ||

उशीर जाहला | जीव हा गुंतला |
प्रपंची वेढला | चहूबाजूं ||

कल्पना सारुन | मनाला मारून |
वास्तव दारुण | स्वीकारते ||

बंधने झेलावी | चाकोरी पेलावी |
वाट ती चालावी| 'रुळ'लेली ||

विसर विचार | रोजचे आचार |
होऊनि लाचार | उरकावे ||

काही न मागणे | केवळ भोगणे |
रोजचे जगणे | विनाशल्य ||

हा जन्म बिकट | गेलासे फुकट |
हाकण्या शकट | संसाराचा ||

तरीही अखंड | आशा ही अभंग |
मनी अनिर्बंध | तेवतसे ||

ठेवा तो सुखाचा | निर्व्याज स्मिताचा |
विसर जगाचा | पाडी झणीं ||

जातील दिवस | निराश निरस |
झडेल विरस | आयुष्याचा ||

खरी की आभासी | आशा ही जिवासी |
बळ अविनाशी | देई खरे ||

पुनश्च हासून | पदर खोचून |
देई ती झोकून | हुरुपाने ||

[टीप -- ज्या वीकांत (वीक-एंड) या शब्दावरून ही कविता सुचली, तो या पोस्टमध्ये वाचला होता. यशोधरा, अनेक आभार :)]